हिंगोली : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी डॉ. रमेश शिंदे यांनी बुधवार (दि.१५) पासून केसापूर येथील स्मशानभूमीत चितेवर बसून उपोषण सुरू केले. दिवसभरात प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही. अतिवृष्टीमळे अनेकांच्या राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या जमिनी खरवडून गेल्या, तर हाती आलेली पिके वाहून गेली आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. बँकेचे कर्ज कसे फेडावे? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. मात्र शासन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याऐवजी ८५०० रुपयांची तुटपुंजी मदत देत आहे.
याशिवाय हिंगोली शहराजवळ कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवले जाणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार असून, जिल्ह्यातील शेतीचे वाळवंट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच मागण्यांसाठी हिंगोली तालुक्यात तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव डॉ. शिंदे यांनी बुधवारी (दि.15) सकाळपासून केसापूर येथील स्मशानभूमीत चितेवर बसून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदवण्याची तयारी सुरू केली आहे.