औंढा नागनाथ : माहेराहून ३ लाख रुपये घेऊन येण्यासाठी एका २२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून, तिला उपाशीपोटी ठेवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा संतोष गोरे (वय २२, मूळ रा. आष्टी, ता. परतूर, जि. जालना; हल्ली मुक्काम- शिक्षण कॉलनीच्या पाठीमागे, औंढा नागनाथ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. दिनांक २० डिसेंबर २०२५ ते १० जून २०२६ या कालावधीत संशयित आरोपींनी "तू माहेराहून ३ लाख रुपये का आणत नाहीस?" असे म्हणत मनीषा यांना सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच त्यांना शिवीगाळ व मारहाण करून उपाशीपोटी ठेवण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. शेवटी या त्रासाला कंटाळून पीडितेने न्याय मागण्यासाठी पाऊल उचलले.
सदर पीडितेची फिर्याद आज महिला दक्षता समितीकडून औंढा नागनाथ पोलीस ठाण्याला प्राप्त झाली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात पती संतोष शिवाजी गोरे, दीर अजय शिवाजी गोरे आणि मावस सासरा बंडू थोरात (सर्व राहणार: आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस पुढील तपास करत आहेत.