जवळाबाजार : एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत असून, जवळाबाजार परिसरात आज या वर्षातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून तापमान सातत्याने ४० अंशांच्या वर राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सकाळी ११ वाजल्यापासूनच उष्णतेच्या लाटा सुरू होत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिक उष्णतेपासून बचावासाठी कुलर आणि एसीचा आधार घेत आहेत, मात्र महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.
दरम्यान, बसस्थानक परिसरात शीतपेये, उसाचा रस आणि आईस्क्रीमच्या दुकानांवर सायंकाळच्या वेळी नागरिकांची गर्दी होत आहे. येत्या दीड महिन्यात उष्णता किती वाढेल, या चिंतेने नागरिक ग्रासले आहेत.