हिंगोली : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी डॉ. रमेश शिंदे यांनी बुधवारपासून केसापूर येथील स्मशानभूमीत चितेवर बसून उपोषण सुरु केले. दिवसभरात प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या तर हाती आलेली पिके वाहून गेली आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. बँकेचे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्या ऐवजी 8500 रुपयांची तुटपुंजी मदत देत आहे.
या शिवाय हिंगोली शहराजवळ कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवले जाणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार असून जिल्हयातील शेतीचे वाळवंट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर बंधारा तातडीने रद्द करावा अशी मागणी डॉ. रमेश शिंदे यांनी केली.
शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली तालुक्यात तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे डॉ. शिंदे यांनी बुधवारी सकाळ पासून केसापूर येथील स्मशानभूमीत चितेवर बसून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदवण्याची तयारी सुरु केली आहे.