हिंगोली : जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून शनिवारी रात्री 6 वाजून ४९ मिनीटांनी जिल्हा भूकंपाने हादरला आहे. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्र बिंदू असून भूकंपाची ३.१ रिश्टर स्केल नोंद झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाने जिल्ह्यातील नागरिक आता पुरते घाबरले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून जमीनीतून आवाज येण्याची मालिका सुरु होती. अचानक जमीनीतून गडगडाट होऊन मोठा आवाज होत होता. त्यानंतर भूकंपाची मालिका सुरु झाली. मागील सहा वर्षात सुमारे ३६ वेळा भूकंपाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात मोठा भूकंप ४.६ रिश्टर स्केल नोंदवला गेला आहे.
दरम्यान शनिवारी रात्री सहा वाजून ४९ मिनीटांनी पुन्हा एकदा भूकंप झाला. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. या भागात चांगलेच हादरे बसले असून त्यासोबतच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही भूकंपामुळे जमीनीला हादरा बसला आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू आता वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातून कळमनुरी तालुक्याकडे जात असल्याचे आजच्या भूकंपावरून दिसून येत आहे.
भूकंपाची कारणे शोधण्यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंपशास्त्र विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र दोन वेळा प्रस्ताव त्रुटी काढून परत पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनानेही सदर प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र भूकंपाचा आवाज शासनापर्यंत पोहोचतच नसल्याने सदर प्रस्ताव शासनाकडे धुळखात पडला आहे. या प्रस्तावानुसार हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर भागात जमीनीची तपासणी करणे, भूगर्भातील खडकाची तपासणी करण्याचे काम केले जाणार असून इतर माहितीही गोळा केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे ७.५० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र शासनाकडून अद्यापही सदर निधीचा प्रस्ताव मंजूर केला नसल्याने जिल्ह्यातील नागरीकांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.