वसमत : शहरात एका युवकाचे जबरदस्तीने अपहरण करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कोडिबा बालाजी क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपींमध्ये भरत क्षीरसागर,विजेंद्र क्षीरसागर रा. वसमत,साई गिरी रा.विरेगाव,साई गिरीचा एक मित्र यांचा समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास विजेंद्र याच्या शेतात ही घटना घडली आमच्याबद्दल माहिती का देतोस भांडणे का लावतोस असा जाब विचारत आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीस जबरदस्तीने काळ्या रंगाच्या गाडीत बसवून अपहरण करण्यात आले.
या घटनेतील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये युवकाला अमानुषपणे मारहाण होत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि श्री. बोंडले हे करीत असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.