हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. २० नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार असताना महाविकास आघाडीमध्ये हिंगोलीच्या जा गेवरून रस्सीखेच सुरूच आहे. मंगळवारी माजी मंत्री जयप्रकाश दांडगावकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने पुणे येथे शरद पवार यांची भेट घेऊन हिंगोलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी अशी मागणी केल्याने महाविकास आघाडीतील गुंता बाढला आहे.
हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघात भाजपविरुद्ध काँग्रेस, कळमनुरी विधानसभा मतदार संघात लिदे सेना विरुद्ध ठाकरे सेना तर वसमत विधानसभा मतदार संघात अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परंतू महाविकास आघाडी व महायुतीमध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघात प्रचंड रस्सीखेच पहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यासह प्रकाश थोरात, अॅड. सचिन नाईक, सुधीर सराफ यांनी दावेदारी सांगितली असतानाच ठाकरे सेनेनेही हिंगोलीवर दावा सांगितला आहे.
शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, डॉ. रमेश शिंदे, परमेश्वर मांडगे यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेस व ठाकरे गट हिंगोलीच्या जागेसाठी आग्रही असताना आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही हिंगोलीवर दावा सांगत आहे. यापूर्वीही शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन हिंगोली मतदार संघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी अशी मागणी केली होती. आता पुन्हा मंगळवारी पुणे येथे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली अनिल पतंगे, माजी उपनगराध्यक्ष शेख निहाल, राजू देशमुख, स्वी गडदे, संचित गुंडेवार यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन हिंगोली विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोडवून घेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.
शिष्टमंडळाशी बोलताना पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये २०० जागांवर एकमत झाले आहे. ८८ जागेवर बोलणी चालू आहे. हिंगोली विधानसभा काँग्रेसकडूनही मागितल्या जात आहे. अद्याप हिंगोलीच्या जागेवर निर्णय झालेला नाही. आम्हीही हिंगोलीची जागा चर्चेत पुढे केली आहे. तडजोडीत निर्णय होईल तो आपणास कळविला जाईल असे शरद पवारांनी सांगितल्याचे माजी उपनगराध्यक्ष शेख निहाल यांनी सांगितले.