हिंगोली : केंद्र सरकारच्या हर घर जल या महत्त्वाकांक्षी घोषणेला तालुक्यातील घोटादेवी येथे प्रशासकीय उदासीनता आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे हरताळ फासला गेला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे भासवले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मदन शेळके यांनी 21 मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
घोटादेवी येथे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागांतर्गत झालेल्या या कामामध्ये तांत्रिक निकषांची पायमल्ली झाल्याचे उघडपणे दिसून येत आहे. कंत्राटदाराने पाईपलाईन टाकताना आणि इतर बांधकामे करताना अत्यंत बोगस साहित्याचा वापर केला असून, काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिलेही लाटली असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
भर उन्हाळ्यात गावकऱ्यांच्या नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली, मात्र त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मदन शेळके यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कामाची पाहणी जिल्हा बाहेरील तटस्थ समितीमार्फत केली जावी.
केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष कामाच्या दर्जाची तपासणी होणे गरजेचे आहे. ज्या कंत्राटदाराने शासनाची फसवणूक करून जनतेला तहानलेले ठेवले आहे, त्याचे परवाने तात्काळ रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे. जर प्रशासनाने 20 मे पर्यंत या मागणीवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तर 21 मे पासून घोटादेवी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार मदन शेळके यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित कंत्राटदाराने केवळ घोटादेवीच नव्हे, तर जिल्ह्यातील इतर अनेक गावांमध्येही अशाच प्रकारे निकृष्ट कामे केल्याच्या तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी कामे अर्धवट असताना किंवा निकृष्ट दर्जाची असतानाही या कंत्राटदाराची बिले काढण्यात आली असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.