Farmers' Massive Protest March on Vasmat Tehsil Office Demanding Cancellation of Shaktipeeth Highway
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही सरकारकडून रेटल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्यास विरोध करत आज हजारो शेतकऱ्यांनी वसमत तहसील कार्यालयावर प्रचंड एल्गार मोर्चा काढला. 'जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची' अशा घोषणांनी आज वसमत शहर दणाणून गेले होते.
तहसीलसमोरील लोकसमुदाय, घोषणाबाजी करणारे शेतकरी, हातात फलक घेतलेल्या महिला शेतकरी आणि कडक पोलीस बंदोबस्त असे वातावरण तयार झाले होते. शक्तीपीठ महामार्गावरून राज्यातील राजकारण आणि समाजकारण सध्या कमालीचे तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये शेतकऱ्यांनी सरकारविरोधात थेट युद्ध पुकारले आहे.
शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करावा, या एकमेव मागणीसाठी आज वसमत तहसील कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा 'एल्गार मोर्चा' धडकला. जमिनी देणार नाही म्हणजे नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. पवनार ते पत्रादेवी दरम्यान होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. आज या विरोधाची धग वसमत शहरात पाहायला मिळाली. तालुक्यातील शेकडो गावांतील शेतकरी, महिला आणि तरुण आज रस्त्यावर उतरले.
हातात मागण्यांचे फलक आणि सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. वसमत भागातील जमीन अत्यंत सुपीक आणि बारमाही बागायती आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची हक्काची जमीन हिरावली जाईल, ज्यामुळे शेतकरी भूमिहीन आणि उद्ध्वस्त होईल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही परिस्थितीत जमिनीचे मोजमाप करू देणार नाही.
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात बाधित शेतकऱ्यांनी तीव्र एल्गार मोर्चा आणि आंदोलने छेडली आहेत. विकासाच्या नावाखाली सुपीक आणि बागायती जमिनी बळजबरीने संपादित केल्या जाणार असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे.
अनेक गावांना मोठा फटका व तीव्र विरोध
शक्तीपीठ महामार्ग वसमत तालुक्यातील सुमारे १७ ते १८ गावांमधून प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील गावांचा समावेश होतो : या गावांमधील बहुतांश जमिनी अत्यंत सुपीक आणि बारमाही बागायती (पाण्याखालील) आहेत. महामार्गामुळे अनेक शेतकरी पूर्णपणे भूमिहीन आणि उद्ध्वस्त होण्याची भीती असल्याने, "एक इंचही जमीन देणार नाही" असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयावर मोर्चा : बाधित शेतकऱ्यांनी वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले आहे.
शासनाने बळजबरीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र उद्रेक होईल आणि प्रसंगी आत्मदहन करू, असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या मते, हा महामार्ग केवळ कंत्राटदार धार्जिणा असून यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन कायमचे हिरावले जाईल. त्यामुळे शासनाने हा मार्ग पूर्णपणे रद्द करावा या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.