हिंगोलीत पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक; कार्यालय फोडले  Pudhari Photo
हिंगोली

हिंगोलीत पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक; कार्यालय फोडले

हिंगोलीत पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक; कार्यालय फोडले

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : पुढारी वृत्‍तसेवा

राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून एक रूपयात पिकविमा योजना आणली. परंतू रब्बी हंगामात अतिवृष्टमुळे झालेल्या हरभरा पिकाचा मंजूर झालेला पीक विमा मोजक्याच शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाला. इतर शेतकरी मात्र पिकविम्यापासून वंचित राहिल्याने संतप्‍त झालेल्या शेतकर्‍यांनी आज (सोमवार) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हनुमान नगर भागात असलेल्या पिकविमा कंपनीच्या कार्यालयात घुसून कार्यालयातील खुर्च्या व इतर साहित्याची तोडफोड केली. र दुसर्‍या घटनेत लाख येथील शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील हरभर्‍याच्या नुकसानीचा पिकविमा भेटला नसल्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत पिकविमा देण्याची मागणी केली.

रब्बी 2023 च्या हंगामाचा पीक विमा काढण्यासाठी राज्य शासनाने एचडी्रएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीची हिंगोली जिल्ह्यासाठी नेमणुक केली होती. हरभरा पिकाचा हजारो शेतकर्‍यांनी पिकविमा काढला होता. दरम्यान नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण पिक उद्धवस्त झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पिकविमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी देखील नोंदविल्या होत्या. मागील आठ दिवसांपुर्वी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर काही रक्‍कम जमा झाली होती. परंतू मोजक्याच शेतकर्‍यांच्या खात्यावर विम्याची रक्‍कम जमा झाल्याचा आरोप शेतकर्‍यांमधून होऊ लागला आहे.

रब्बी हंगामाचा पिकविमा मिळावा या मागणीसाठी तसेच तक्रार करूनही विमा का मिळाला नाही या बाबीची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील 40 ते 50 शेतकरी सोमवारी दुपारी हनुमान नगर भागात असलेल्या कंपनीच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचार्‍यास विचारणा केली. परंतू कर्मचार्‍यांनी दिलेल्या उत्तराने शेतकर्‍यांचे समाधान झाले नाही. संतप्‍त झालेल्या शेतकर्‍यांनी अखेर कार्यालयातील खुर्च्या व इतर साहित्याची तोडफोड केली तर शेतकरी आक्रमक झाल्याचे लक्षात येताच कार्यालयातील कर्मचार्‍यांनी धुम ठोकली. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

शेतकर्‍यांनी दिला आंदोलनाचा इशारा

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकर्‍यांनी 2023 च्या रब्बी हंगामात हरभर्‍याचा पिकविमा काढला होता. डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने विमा कंपनीकडून हरभर्‍याला विमा मंजूर करण्यात आला होता. शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार देखील केली होती. परंतू अद्यापही शेतकर्‍यांना पिकविमा मिळाला नसल्याने लाख येथील शेकडो शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन पाठविले. जुलै अखेरपर्यंत पिकविमा मिळाला नाही तर 1 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT