विधान परिषदेसाठी पुन्हा डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाली Pudhari News Network
हिंगोली

Pradnya Satav : सातव यांना पुन्हा विधान परिषदेसाठी काँग्रेसची उमेदवारी

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी पुन्हा डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी के.सी.वेणुगोपाल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. डॉ. सातव यांची निवड निश्‍चित झाल्याने सातव गटाला दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेसमधील सातव विरोधकांना चांगलीच चपराक बसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम केले नसल्याची तक्रार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्या तक्रारीची साधी दखल देखील घेतली नाही. उलट डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी विश्‍वास दाखवत त्यांना विधान परिषदेवर दुसर्‍यांदा संधी दिली आहे.

स्व. राजीव सातव हे खासदार राहूल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ नुकताच संपल्यानंतर पुन्हा काँग्रेस डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी देणार काय असा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतू पक्षश्रेष्ठींनी पुन्हा डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन सातव घराण्याला न्याय दिला आहे. डॉ. प्रज्ञा सातव या हिंगोली लोकसभा मतदार संघातून काँगे्रसकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतू ठाकरे गटाला जागा सोडण्यात आल्याने डॉ. सातव यांना दोन पावले मागे घ्यावे लागले.

लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यानंतर विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी डॉ. प्रज्ञा सातव यांची थेट के.सी.वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती. यावर कोणताही निर्णय झाला नसतानाच सोमवारी के.सी. वेणुगोपाल यांनीच डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. कळमनुरी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते इतर पक्षात जात असल्याच्या चर्चा सातत्याने झडत होत्या. कळमनुरी विधानसभा मतदार संघात काँगे्रसला मरगळ आल्याचे चित्र असताना डॉ. प्रज्ञा सातव यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे.

पक्षश्रेष्ठींनी साधले सोशल इंजिनिअरींग

काँग्रेसने पुन्हा डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करून सोशल इंजिनिअरींग साधल्याचे बोलले जात आहे. ओबीसी समाजातून येत असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन ओबीसी मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सातव घराण्याची कायम काँग्रेससोबत असलेली निष्ठाही त्यांच्या उमेदवारी जाहीर करण्यावरून अधोरेखित झाली आहे. मागील काही वर्षापासून हिंगोली काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून येत आहे. गटबाजी असतानाही पुन्हा पक्षश्रेष्ठींनी प्रज्ञा सातव यांच्यावर विश्‍वास दाखविल्याने आगामी काळात हिंगोली काँग्रेसमधील चित्र बदलेल असा दावा केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT