हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे नागेश पाटील-आष्टीकर हे निवडुन आले असले तरी, काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याची तक्रार खासदार आष्टीकर यांनी थेट काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव के.सी.वेणुगोपाल यांच्याकडे पत्राद्वारे केल्याने महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी खासदार आष्टीकरांच्या तक्रारीवर कार्यवाही करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील काही नेत्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच काँग्रेसचे हिंगोली शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांनी एका काँग्रेस नेत्याने महाविकास आघाडीच्या विरोधात काम केल्याची तक्रार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यांचा रोख काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्याकडे होता. त्यानंतर खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनीही नुकतेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणुगोपाल यांना पत्र पाठवून डॉ. सातव यांची तक्रार केली.
डॉ. सातव यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला असून त्यांच्या या कृतीमुळे शिवसेनेच्या (ठाकरेगट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यांनी वंचित बहुजन आघाडी तसेच एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे पत्रात नमुद केले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी महाविकास आघाडीच्या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला नसल्याचेही नमुद केले आहे. या प्रकाराची काँग्रेस पक्षाकडून चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, ज्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचे पत्रात नमुद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून काय चौकशी केली जाणार अन पक्षविरोधी प्रचार केल्याबद्दल डॉ. सातव यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दोन महिन्यानंतर खासदार पाटील यांना आलेली जाग म्हणजे विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असे मला वाटते असे. कितीतरी राजकीय षडयंत्राचा सातव परिवाराने मागील 40 वर्षाच्या काळात सामना केलेला आहे आणि वेळप्रसंगी चोख उत्तर देखील दिलेले आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी काही मंडळी कामाला लागली होती आणि परत आता काही मंडळी तसेच प्रकार करण्याचे प्रयत्न करीत आहे. परंतु कोणीही केलेल्या कोणत्याही खोट्या आरोपाला आम्ही घाबरत नाही आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुकांसाठी काही राजकीय विरोधकांनी एकत्रितपणे ठरवुन रचलेला हा डाव आहे ते आम्ही लवकरच उधळून लावु, अशी प्रतिक्रिया आमदार प्रज्ञा सातव यांनी दिली.