गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवस्थापनाच्या अकार्यक्ष कारभारामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. गत आठवड्यात १ रुपया भावाचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी (दि. १६) पुन्हा अतिशय चांगल्या कांद्याला लिलावामध्ये केवळ २ रूपये प्रतिकिलो भाव मिळत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने तो विकण्यापेक्षा गंगापूर -वैजापूर महामार्गावर फेकल्याने दोन्हीकडील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.
वाहेगाव येथील शेतकऱ्याने मंगळवारी येथील कांदा मार्केटमध्ये टेम्पो मध्ये साडेतीन क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. अकरा वाजेच्या सुमारास कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर त्यांच्या कांद्याला २ रूपये प्रतिकिलो भाव व्यापाऱ्याने लावला. केवळ दोन रूपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा संयम सुटला. शेतकऱ्याने टेम्पो सरळ बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महामार्गावरील रस्त्यावर खाली केल्यानंतर क्षणार्धात परिसरातील शेतकरी जमा झाले व त्यांनी कांदा लिलाव बंद पाडून महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू केले. या आंदोलनानंतर वैजापूरहून येणारी व तिकडे जाणाऱ्या सर्व वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बारा वाजेच्या सुमारास पोलिसांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्याने टाकलेला कांदा भरून घेतल्यानंतर बाजार समिती प्रशासनाशी मार्ग काढण्यासाठी भेट घालून देण्याचे आश्वासन दिले. अर्धा तासानंतर वाहतूक सुरळात करण्यात आला.
दरम्यान, गंगापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला रूपये ५ पैसे भाव दिल्याच्या कारणावरून आंदोलनात शुक्रवारी (दि. १२) शेतकऱ्यांनी कांद्याचा दहावा घालून मुंडण आंदोलन केले होते.
या घटनेनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने बुधवारपासून (दि. १७) येथील मोकळा व गोणी कांदा खरेदी विक्रीचा लिलाव पुढील आदेश येईपर्यंत बेमुदत बंद ठेवण्याचा लेखी आदेश काढला आहे.