Dharashiv Temperature : तापमान 40 अंशांवर; डोळ्यांच्या त्रासापासून सावध राहा  file photo
धाराशिव

Dharashiv Temperature : तापमान 40 अंशांवर; डोळ्यांच्या त्रासापासून सावध राहा

उमरगा : प्रखर सूर्यकिरणांमुळे होऊ शकतो धोका

पुढारी वृत्तसेवा

शंकर बिराजदार

उमरगा : तालुक्यात सध्या तापमान वाढले आहे. सध्या तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात तसेच हवेतील धूळ, धूर, मातीचे बारीक कण आणि उन्हामुळे डोळ्यांच्या त्रासात वाढ होण्याची शक्यता असते. अशा पार्श्वभूमीवर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ करू लागले आहेत.

उमरगा शहर व ग्रामीण भागात यावर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्याची चाहूल लागली. मार्च महिन्यांच्या शेवटी सरासरी तापमान 37 अंश सेल्सिअस होते. वरचेवर उन्हाचा कडाका वाढतच आहे. उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यानंतर महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन त्यांचे कार्य बिघडते. त्यास उष्माघात असे म्हणतात. याचे उन्हाळयात सर्वात जास्त प्रमाण असते.

उष्माघातामुळे रुग्णांचा मृत्यूही संभवतो. तर उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा परिणाम शरीराबरोबरच प्रखर सूर्यकिरणांमुळे डोळ्यावर पांढरा पडदा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांच्या लहान सहान तक्रारींकडे दुर्लक्ष व घरगुती उपाय न करता तत्काळ तज्ञांकडे नेत्र तपासणी करून त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन नेत्र रोग तज्ञांनी केले आहे.

डोळ्यांची लक्षणे व घ्यावयाची काळजी!

डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, कोरडे पडणे, पाणी येणे, डोळ्यांना टोचल्यासारखे वाटणे ही लक्षणे आहेत. तर भरपूर पाणी पिणे, सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या, घराबाहेर पडताना चांगल्या काचेचे गॉगल आणि टोपीचा वापर करावा, सतत स्वच्छ व थंड पाण्याने डोळे धुवावेत, महिलांनी चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधने वापरताना डोळ्यात जाणार याची काळजी घ्यावी, रस्त्यावरील फॅशनेबल गॉगल्सचा वापर टाळावा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आय ड्रॉपचा वापर करावा.

उष्माघाताची लक्षणे!

सुरुवातीला थकवा येणे, तहान लागणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे अशी लक्षणे अचानक होऊ शकतात. या सुरवातीच्या लक्षणांकडे वेळीच उपाय न केल्यास रुग्णाची जीभ कोरडी पडणे, डिहायड्रेशन, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, त्वचा लाल होणे, पायाला गोळे येणे, आकडी येणे, बेशुध्द होणे, चक्कर येणे ही लक्षणे आढळून येतात.

उष्माघाताची कारणे!

भर उन्हातही काम, पुरेसे पाणी न पिणे, मद्यपान व कॅफीनचे सेवन जास्त केल्यामुळे, दुपारच्या वेळी पुरेसे पाणी न पिता व्यायाम करणे, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, यकृताचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीचे आजार आदी उष्माघाताची कारणे आहेत.

उन्हाळ्यात दररोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, पपई, गाजर, दूध तसेच रसाळ फळाचा वापर करावा,सुती आणि हलके कपडे घालावेत, घरात थंड हवा राखण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्या, तीव्र उन्हामध्ये जाणे टाळावे, हलका आहार, फलाहार, उसाचा रस, लिंबू पाणी, ताक व जास्ती जास्त पाणी प्यावे. गरज भासल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
डॉ विजय बेडदुर्गे, उमरगा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT