तुळजापूर : सध्या वैशाख वणवा चांगलाच पेटला असून, तुळजापूरचा पारा चाळीस अंशांवर पोहोचला आहे. वाढलेले तापमान सर्वांच्या आजारपणाला खतपाणी घालणारे ठरत असून सध्या शहरातील प्रत्येक रुग्णालये तापाच्या रुग्णांनी गजबजले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून सूर्यनारायण आग ओकीत असून प्रत्येकाच्या घशाला कोरड पडत आहे.
गेल्या वैशाख प्रतिपदेपासून उष्णतेची झळ चांगलीच बसत असून मागील आठवड्यात तापमान 35 ते 38 अंश डिग्री सेल्सिअस एवढे होते मात्र आज रविवारी (26 एप्रिल) तापमान 40 अंशाच्या पुढे सरकले आहे. सध्या तुळजपुरात देवी दर्शनार्थ लाखोंच्या संख्येने गर्दी होत आहे. मंदिर प्रशासनाने खास उन्हासाठी तयार केलेले पर्यायी निवारा शेड अपुरे पडत आहेत. असंख्य भाविकांना ऊन डोक्यावर घेवूनच सर्वत्र वावर करावा लागत आहे. या जीवघेण्या तापमानावर शक्कल चालवीत अनेकांनी पहाटे पाच ते सकाळी दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री दहा ही वेळ मातेच्या दर्शनासाठी निश्चित केली आहे.
तुळजापुरात सध्या तापमान वाढल्याने दररोज लाखों लिटर बंद बाटली पाण्याची विक्री होत आहे. याशिवाय शीत पेये, लस्सी, आईस्क्रीम, उसाचा रस, सरबत, बर्फ गोळे यांचीही मागणी वाढली आहे. तापलेले ऊन लहान-थोरांसाठी घातक असून उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर गमचे, टोप्या घालण्याचा सल्ला वैद्याकडून दिला जात आहे. प्रत्येकाने पाण्याची बाटली सोबत ठेवून तहान लागताच पाणी पिणे गरजेचे आहे. वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाणी कमी होण्याने डोळ्याला अंधारी येणे, चक्कर येणे असे प्रकार अनुभवास येत आहेत.
ऐन उन्हाळ्यातही दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रमधून मोठ्या प्रमाणत गर्दी होत आहे. सकाळी 10 नंतर सुरु झालेल्या उन्हाची तीव्रता दुपारी 12 नंतर मोठ्या प्रमाणत वाढते आहे. त्यामुळे दर्शन रांगेत बराचवेळ उभे असलेले भक्त बाहेर आल्यानंतर मोकळा श्वास घेत असले तरी उन्हाच्या तडाख्याने पुरते हैराण होत असल्याचे दिसून येत आहेत. मंदिर परिसरात 24 तास आरोग्य सेवेचे पथक कार्यरत ठेवावे, अशी मागणी समस्त मातेच्या भक्तांतून होत आहे.