भूम : अहिल्या नगर मार्गावरील चिंचोली (स्व. गोपीनाथ मुंडे चौक) गोलाई चौकात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली गोलाई चौकात ईट, नगर आणि भूम या तीन दिशांमधून वाहने एकाच वेळी चौकात आल्याने रामकुंड येथील क्रूझर, बुरुडवाडी येथील पिकअप आणि भूम येथील चारचाकी वाहनांची जोरदार धडक झाली. या तिहेरी धडकेत अपघाताची तीव्रता वाढली.
या अपघातात सचिन सुभाष येवते (भूम), प्रवीण शिवाजी हाके (रा. रामकुंड), राजाराम भगवान हाके (रा. रामकुंड), राणी हौसेराव शिंदे (रा. बुरुडवाडी), स्नेहा हौसेराव शिंदे (रा. बुरुडवाडी), अर्चना एकनाथ शिंदे (रा. बुरुडवाडी) आणि कोकिळा विश्वास दुरुगुंडे हे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या प्रवीण शिवाजी हाके आणि राणी हौसेराव शिंदे यांना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिव येथे रेफर करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद संबंधित यंत्रणेकडून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या चौकात तीनही बाजूंनी वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वारंवार अपघात होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. चौकात स्ट्रिप गतिरोधक बसवून वाहतूक नियंत्रणाची ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.