Plan ahead for water scarcity, tankers, and fodder
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा आठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात पुरेसा पाऊस न झाल्यास गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पिण्याचे पाणी, टँकर आणि चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करावे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी पाणीटंचाई आणि पीक नुकसानीचा आढावा घेतला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राणाजगजितसिंह आमदार पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पावसाची तूट लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाईसाठी आतापासूनच टँकरचे नियोजन करावे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पाणी व चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. पिकांना पाणी देण्याच्या काळात महावितरणने आपत्कालीन वीज भारनियमन करू नये, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. खासदार राजेनिंबाळकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
प्रत्यक्ष पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पीक कापणी प्रयोगाचे काम आठवडाभरात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाच्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यात पाच तर लोहारा तालुक्यात एक टँकर सुरू आहे. १८४ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील भूजल पातळीतही मोठी घट झाली असून काही ठिकाणी ती सुमारे सात मीटरने खालावली आहे. सिंचन प्रकल्पांतील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शेतीसाठी पाणी देणे बंद करण्यात आले आहे.