धाराशिव : जिल्ह्यात रविवारी रात्री पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार ते अतिवृष्टी झाली. कळंब तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून मोहा, कळंब, खामसवाडी आणि गोविंदपूर परिसरात नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
या पावसामुळे परिसरातील ओढे-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भागातील रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, दीर्घकाळापासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या दमदार पावसामुळे समाधानाचे वातावरण दिसून आले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पावसाची नोंद लक्षणीय राहिली. धाराशिव तालुक्यात 32.1 मि.मी., उमरगा 29.8 मि.मी., वाशी 24.9 मि.मी., परंडा 23.4 मि.मी., तुळजापूर 22.5 मि.मी., लोहारा 16.0 मि.मी. आणि भूम तालुक्यात 15.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाणही वाढले आहे.
जिल्ह्यातील पर्जन्यमानानुसार काही तालुक्यांत पावसाची तीव्रता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः कळंब तालुक्यातील पाऊस हा इतर तालुक्यांच्या तुलनेत खूपच जास्त नोंदवला गेला आहे.
तालुकानिहाय पाऊस
जिल्ह्यात 8 जून रोजी सरासरी 31.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 68.9 मि.मी. पाऊस कळंब तालुक्यात झाला. त्याखालोखाल धाराशिवमध्ये 32.1 मि.मी., उमरगा 29.8 मि.मी., वाशी 24.9 मि.मी., परंडा 23.4 मि.मी., तुळजापूर 22.5 मि.मी., लोहारा 16 मि.मी. तर भूम तालुक्यात 15.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.