उमरगा (जि धाराशिव) : शंकर बिराजदार
उमरगा शहरालगत असलेल्या सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर अचानक आज (बुधवार) (दि २२) सकाळी उबाठाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यासोबत ठिय्या मारला. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
सोलापूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत वारंवार अंदोलने, विनंती करूनही बाह्यवळण रस्त्याच्या कामांत सुधारणा होत नाही. बाह्यवळण मार्गावर नेहमी अपघात होत आहेत. यातच शहरातील एका युवकाचा काल मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग व बाह्यवळण रस्ता कामाकडे महामार्ग अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उबाठाचे आमदार प्रविण स्वामी यांच्यासह अचानक महामार्गावर रास्तारोको केला. शेतकऱ्यांनी अचानक महामार्गावर ठिय्या दिल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
दरम्यान महामार्गाच्या कामांत सुधारणा झाली नाही, तर येत्या २६ जानेवारी पासून टोल वसूली बंद करून जन आंदोलनाचा इशारा दिला आहे. अर्धा तास झालेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूला दिड किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.