धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : महायुती सरकाने जनतेची दिशाभूल करीत कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला अतिशय कमी निधी दिला. त्यामुळेच हे काम रखडले. तरीही भाजपचे आ. राण जिगजितसिंह पाटील हे अर्थवट कामाचे उद्घाटन करीत फिरत आहेत. निवडणुका आल्या की त्यांना 'उद्घाटन्या' आजार जडतो, अशी जोरदार ठाकरे शिवसेनेचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी सिंदफळ (ता. तुळजापूर) येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी ही टिका केली. खा. राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील म्हणाले, की कृष्णा खोऱ्यातील कधी २१ कधी ७ तर अनेकदा २४ टीएमसी पाण्याच्या गप्पा मारल्या जातात. महायुती सरकारने कार्यारंभ आदेश देण्यास ८ महिने उशीर लावला. ८४० कोटींची मूळ तरतूद असताना नंतर केवळ ५०० कोटींची तरतूद केली. सांगताना मात्र ११०० कोटी दिल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात केवळ ६० कोटी रुपये आले आहेत. तरतूद व निधी जास्त मिळण्याची आवश्यकता आहे. अजूनही वेळ गे लेली नाही. आचारसंहितेचा अगोदर जास्त तरतूद करावी.
धनेगाव, निम्न तेरणा ही धरणे धाराशिव जिल्ह्यात आहेत. पाण्याचा सर्वाधिक फायदा मात्र लातूर जिल्ह्याला होतो. त्यामुळे यापूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी बांधून ठेवलेली कोल्हापुरी बंधारे उपयुक्त ठरलेली नाहीत. त्यांचे रुपांतर बरेजमध्ये करण्याची मागणी, प्रस्ताव असताना तो थंड बस्त्यात ठेवण्याचे काम महायुतीने केले आहे. त्यामुळे जनता हे कधी विसरणार नाही, असा इशारा या दोन्ही नेत्यांनी दिला.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूरकरांनी पाच वर्षांपूर्वी आमदार केले. आता मात्र त्याच तुळजापूरकरांचा उल्लेख आक्षेपार्ह शब्दांत आ. पाटील करीत आहेत. हे चुकीचे आहे. सिंदफळ येथे घडलेला प्रकार निंदनीय आहे. तेथून आ. पाटील यांनी पळ काढला नंतर मात्र त्यांनी रील्स बनवून डॉनगिरी अशी टीकाही खा. राजेनिंबाळकरांनी केली. ते म्हणाले, की तुळजापूरकरांनी लोकसभा निवडणुकीत ५५ हजारांचे मताधिक्य आम्हाला दिले यावरुन स्पष्ट होते की येणार्या विधानसभा निवडणुकीत चुकीच्या लोकांना जनता नक्कीच धडा शिकवेल.