Independent candidates won the Zilla Parishad elections in Dharashiv
भीमाशंकर वाघमारे : धाराशिव धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलले आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांचाच जलवा पाहायला मिळाला. चार अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत प्रस्थापितांना आणि दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदार अर्चना पाटील यांनी आपला गड राखला असला तरी, सक्षणा सलगर आणि संजय पाटील दुधगावकर यांसारख्या नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे.
मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला. तानाजी सावंत यांनी पूर्ण ताकद पणाला लावूनही भाजपच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या धनंजय सावंत यांनी बाजी मारली. भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्याने बंडखोरी केलेल्या अर्चना जाधव यांनी पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते प्रकाश आष्टे यांची कन्या प्रियंका आष्टे यांचा पराभव केला. आलूर गट येथे साडू-भावांमधील लढत चर्चेची ठरली. शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार आप्पासाहेब पाटील यांनी भाजपचे उमेदवार आणि त्यांचे साडू मदन पाटील यांना आस्मान दाखवले. लोणी येथे ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवार राणी ढोरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला.
अर्चना पाटलांचा विक्रमी विजय
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर गटातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
भाजपला भूममध्ये भोपळा
भूम पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला असून, पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. तसेच अंबेजवळगा गटात ठाकरे गटातून आयात केलेल्या उमेदवाराचा सुमन सातपुते यांनी पराभव केल्याने भाजपवर नामुष्की ओढवली आहे.
आयारामांना मतदारांनी नाकारले
निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या आणि आयात केलेल्या उमेदवारांना धाराशिवच्या मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. अंबेजवळगा गटातील भाजपचा प्रयोग फसला असून, निष्ठवंत आणि बंडखोर अपक्षांनी बाजी मारल्याने पक्षांच्या तिकीट वाटपावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिग्गजांना धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सक्षणा सलगर यांना तेर गटातून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर त्यांनी गावकीपेक्षा भावकीला महत्त्व दिले गेले, अशी टीका करत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा नायगाव गटातून अनपेक्षित पराभव झाला, हा निकाल राजकीय वर्तुळात धक्कादायक मानला जात आहे.