Farmers worried due to the delayed onset of rains
ईट, पुढारी वृत्तसेवा : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाच्या मृगाने सलामी दिली ती कोरडीच ! त्यामुळे मिरगाची पेरणी झालीच नाही. त्यामुळे लहरी हवामानाने बळीराजाच्या तोंडचे पाणीच पळविले. "पड रे पाण्या, कर लवकर पाणी-पाणी; शेत माझे लई तहानलं चातकावानी..." अशी आर्त हाक देत बळीराजा आता वरुणराजाच्या कृपादृष्टीची वाट पाहत आहे.
जून महिना लागल्यानंतर सुध्दा तापमान कमी होत नसल्याने आणि जून महिना हि संपत आला तरी अजून हि पाऊस गायब झाला आहे. शेतकरी अडचणी सापडला आहे. जून महिना सरत आला तरी पावसाने तोंड न दाखवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आजकाल निसर्ग लहरी बनल्याने ऋतुचक्र उलटे फिरू लागले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन अनेक दिवस लोटले तरीही मृगधरा बरसण्यास तयार नाही.
तो हि आता संपण्याच्या मार्गावर आला आहे. काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्यासाठी रणरणत्या उन्हात घामाच्या धारा झेलित सर्व 'ओक्के' करून ठेवले. पण, वरूणराजा रुसल्याने बळीराजाचे स्वप्न होरपळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, अवेळी धिंगाणा घालणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडविले तहानलेल्या आसुसलेल्या डोळ्यात जीवनाचा मेघ दाटून येत आहे.
मान्सून वेळेवर येणार, मृग नक्षत्र बरसणार, आर्दा झोडपणार अशा पावसाच्या बातम्या ऐकून सुखावलेल्या शेतकऱ्यांची आभाळात ढंग मरून येतानाही पाऊस गळत नसल्याने चक्क झोपच उडाली आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना हवामान खाते आणि अभ्यासकांच्या अंदाजाचा शॉक बसल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांनी पूर्व पावसाळी कामे आटोपून खरिपाची तयारी केली आहे. रोहिणी नक्षत्र कोरडेच गेले आता मृग नक्षत्र सुरू होऊन ते हि आता संपण्याच्या मार्गावर आला आहे. तरी पावसाचा थांगपत्ता नाही. अवेळी धिंगाणा घालणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडते आहे. नक्षत्राच्या वाहनावरून पावसाचा अंदाज याचा विचार जर केला तर भारतीय पंचांगानुसार नक्षत्राचे वाहन हत्ती, म्हैस, बेडूक असल्यास दमदार पाऊस, गाढव, उंदीर असल्यास मध्यम तर घोड़ा व कोल्हा असल्यास विरळ पाऊस होतो असा अंदाज बांधला जातो.
याकडेही सर्वांचे लक्ष आहे. आता आर्द्रा हे लागणार आहे. किमान या नक्षत्र लागणार आहे. यामध्ये तरी चांगला पाऊस पडून काळ्या आईची ओटी भरावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे. यावर्षी हवामान खात्याकडून सुपर एल निनोच्या संभाव्य प्रभावाबाबत आधीच चर्चा सुरू आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. आता लवकरात लवकर दमदार पावसाच्या सरी बरसून पेरणीसाठी तयारी करावी, एवढीच अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.