Dahiphal Unseasonal Rain
रत्नापूर : कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गुरुवारी (दि.७) दुपारी चारच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे दहिफळसह सापनाई व आवधुवाडी परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सुमारे एक तास कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दहिफळ येथे गुरुवारी साप्ताहिक बाजार भरत असल्याने परिसरात मोठी गर्दी होती. अचानक काळे ढग दाटून आल्याने व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होताच बाजारातील व्यापारी, ग्राहक व शेतकरी यांची एकच पळापळ झाली. बाजारातील माल, भाजीपाला व इतर साहित्य वाचवण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोठी धडपड केली. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांची माळ जागताना व माल झाकण्यासाठी धावपळ करताना दिसून आले.
सध्या ज्वारी काढणीचा हंगाम सुरू असून शेतात ज्वारी मळणीचे काम वेगात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी मळून ठेवली होती तर काही जण मळणी करून घरी नेण्याच्या तयारीत होते. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शेतातील ज्वारी भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. कष्टाने उभे केलेले पीक अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले होते. या पावसामुळे उकाड्यातून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे आनंदावर विरजण पडले आहे. दहिफळ बाजार परिसरात पावसादरम्यान व्यापारी, शेतकरी व नागरिकांची झालेली तारांबळ पाहायला मिळाली.