Farmers Crop Loss Tuljapur
अणदूर; तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात यंदा वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावटनिर्माण झाले आहे. पावसाअभावी खरीप पिके संकटात सापडली असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैलपोळा गुरुवारी (दि.१०) परिसरात अत्यंत साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घालून त्यांची सजावट केली. बैलांच्या शिंगांना रंग देण्यात आला, गळ्यात घंटा व आकर्षक सजावटीच्या वस्तू बांधण्यात आल्या. घरातील महिला व मुलांनी बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळी, गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखविला. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलांची मिरवणूकही काढण्यात आली.
मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडले. पिकांची वाढ खुंटली असून जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा बैलपोळा यंदा शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनसामग्रीतच साधेपणाने साजरा केला.
शेतकऱ्यांचा खरा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असून, शेतीच्या परंपरेशी जोडलेली ही संस्कृती आजही ग्रामीण भागात जपली जात आहे. दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी परंपरा कायम ठेवत बैलपोळा साजरा केला.
अणदूर येथील शेतकरी बालाजी राजपूत यांनी बैलपोळ्याच्या निमित्ताने आपल्या बैलावरती विविध मागण्या लिहून दुष्काळाबाबत आपली भावना व्यक्त केली.यामध्ये त्यांनी दुष्काळ तत्काळ जाहीर करा,हेक्टरी ५० हजार अनुदान द्या,चारा छावण्या तात्काळ सुरू करा, पिक विमा व इतर प्रलंबित बिले तात्काळ देऊन सहकार्य करा, शेतकरी जगला तर देश जगला बैलावरती लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.