लोहारा तालुक्यातील बेलवाडी व बेंडकाळ येथील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान. Pudhari photo
धाराशिव

Dharashiv Heavy Rain | लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान

Dharashiv Heavy Rain-पंचनाम्याचा फार्स; सरसकट भरपाई देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Heavy Rain news

लोहारा - सतत कोसळणाऱ्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग व इतर पिकासह जवळपास सर्व पिके पाण्यात बुडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या शेतात उभे पीक पूर्णतः उद्धस्त झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यासोबतच शेतकऱ्यांची घरे, जनावरे, गोठे व शेतमाल साठवणही पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागात हाहाकार माजला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया फार्स ठरत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ पद्धतीमुळे पंचनामे वेळेत होत नाहीत, त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली जात नाही, पंचनामे झाले तरी वास्तव नुकसानाचे योग्य मूल्यमापन होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. शेतात उभ्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, पण पंचनाम्यात किती टके नुकसान दाखवले जाते. हे कळत नाही.

शेतकऱ्यांना स्वतःचा शेतातील फोटो काढून तलाठी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले गेले, पण संपूर्ण शेतकऱ्यांना ही माहितीच नसल्याने शेकडो शेतकऱ्यांना फोटो देता आले नाहीत. पाऊस सर्वत्र पडलेला असल्यामुळे नुकसानही सर्वच शेतकऱ्यांचे झाले आहे. पंचनामा व कागदपत्रांचा खेळ कशासाठी खेळला जात आहे. याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आता फक्त पिकांच्या नुकसानापुरता राहिलेला नाही, तर जीवनावश्यक प्रश्न बनला आहे. बँकांचे हप्ते कसे फेडायचे? जनावरांना चारा कुठून आणायचा? मुलांचे शिक्षण कसे करायचे? असे सवाल पीडित शेतकरी करत आहेत, सरकारकडून मदत केव्हा जाहीर होईल, याबाबत संभ्रमच आहे. मात्र पंचनामे व शासकीय प्रक्रिया यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती मदत पोहोचण्यासाठी वेळ लागू नये.

सरसकट मदतीची मागणी
त्यामुळे शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे की, पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा थांबवावा आणि सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात तातडीने नुकसान भरपाई जमा करण्यात यावी, केवळ पीकनुकसान नव्हे तर जनावरांचे, घरांचे व गोठ्यांचे नुकसान यासाठीही मदत जाहीर केली जावी. सरकारने पंचनाम्याचा खेळ थांबवून तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT