रत्नापूर; पुढारी वृत्तसेवा : रत्नापूर येथे शुक्रवारी (दि. ३०) भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. चोरट्यांनी ६ लाखांचे दागिने आणि ९५ हजारांच्या रोख रकमेवर डल्ला मारला.
याबाबत माहिती अशी की, रत्नापूर गावातील अंगणवाडी सेविका उषाबाई महादेव जाधवर हे शेतात ज्वारीच्या मळणीसाठी गेलेले होते. दरम्यान घराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करत कपाटाचे कुलूप तोडून २३ तोळे सोने, १० हजार रुपयांची चांदी, रोख रक्कम ९५ हजार रुपये असा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (दि. ३०) भर दुपारी घडली.
रत्नापूरमध्ये दिवसा ढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेने ग्रामस्थ धास्तावले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उषाबाई महादेव जाधव यांच्या फिर्यादीनुसार येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आवारे करत आहेत.