मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर 
धाराशिव

Dharashiv Heavy Rain : मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

रत्नापूर : रात्रीपासून येरमाळा व आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदी दुथडी भरून वाहत असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

वाहतुकीवर परिणाम;अनेक गावांचा संपर्क तुटला

रत्नापूर येथील तेरणा नदीवरील पूल पूर्णतः वाहून गेला आहे. तसेच दहिफळ, संजीतपुर, सातेफळ येथील पुलांवरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

शेतीचे मोठे नुकसान

नदीच्या पाण्याचा जोर वाढल्याने तेरणा नदीने प्रवाह बदलून शेतांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, उडीद, मूग यांसारख्या खरीप पिकांना फटका बसला आहे. शेतजमिनीतील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तहसील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची मदतीची मागणी

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT