धाराशिव : धाराशिव ते बोरफळ या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून, कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच मंगळवारी रात्री पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दोन दिवासंपूर्वी याच खड्ड्यात कारही पडली होती. या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने कंत्राटदाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या कामाच्या बाबतीत ठिकठिकाणी तक्रारी वारंवार समोर येत असून सारोळा, चिखली, दारफळ तसेच परिसरातील ग्रामस्थांनी यापूर्वी आंदोलन करत कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.दरम्यान, सांजा गावाजवळ सुरू असलेल्या पुलाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असून त्या ठिकाणी मोठा व धोकादायक खड्डा पडलेला आहे.
याच खड्ड्यात भंडारवाडी येथील तरुण ओम अंधारे हा पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिकांच्या माहितीनुसार, या रस्त्यावर यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. खराब रस्ता, अपूर्ण काम आणि योग्य सूचनाफलकांचा अभाव यामुळे वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे सोलापूरहून येणारी एक चारचाकी गाडी देखील याच खड्ड्यात पडली होती. त्या अपघातात गाडीतील एक जण गंभीर जखमी झाला होता. एवढे गंभीर प्रकार घडूनही संबंधित ठिकाणी कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आली नव्हती, यामुळे प्रशासन आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या रस्त्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतानाही प्रत्यक्षात वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कंत्राटदार करीत नसल्याने त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.