भूम : भूम शहरातील भूम-नगर रोडवरील साहिल कॉम्प्लेक्सजवळ एका तरुणावर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी करण्यात आले. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय असून, पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी वसीम नसीर बेग मोगल (वय २९), जो अलमप्रभू नावाने पानटपरी चालवतो. याच्यावर दि. २८ फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी ०४.०० वाजता भूम ते नगर जाणारे रोडवरील साहिल कॉम्लेक्स जवळ आलमप्रभू पानटपरी समोर भूम येथे सलमान दस्तगीर पठाण (रा. शिवशंकरनगर, भूम) आणि दोन अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला. सलमान पठाण याने फिर्यादीला पानटपरीबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला पकडून ठेवले आणि पठाण याने "आता तुला जीवंत सोडत नाही" असे म्हणत कोयत्याने वार केले. फिर्यादीने प्रतिकार केला, मात्र त्याच्या खांद्यावर, पाठीत आणि कंबरेवर गंभीर वार झाले. पळून जात असताना एकाने त्याच्या हातावरही वार केला.
या घटनेनंतर वसीम मोगल याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सलमान पठाण आणि दोन अज्ञात व्यक्तींविरोधात दि. ०१. मार्च रोजी ४.०७ वा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सरोदे करत आहेत.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे भूम शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.