भूम : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी भूम पोलिसांनी गुरुवारी (दि. २७) गोलाई चौक, बसस्थानक परिसरासह विविध ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध धडक मोहीम राबवली. या कारवाईत तब्बल २१४ केसेस दाखल करून १ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आता सर्वच मोठ्या प्रकारच्या वाहनांवर कारवाई कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. भूम पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच धाराशिव वाहतूक शाखेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
विना क्रमांक किंवा फॅन्सी नंबर प्लेट, विना परवाना वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, दुचाकीवर तिघांचा प्रवास, कर्कश आवाज करणारे बदललेले सायलेन्सर, काळ्या काचा, सीट बेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
मात्र, दुचाकी व चारचाकींवर कारवाई होत असताना शहरातून ये-जा करणाऱ्या मोठ्या मालवाहू वाहनांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावरही समान निकषाने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोठ्या वाहनांमुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने 'नियम दुचाकी-चारचाकींसाठीच की मोठ्या वाहनांनाही लागू?' असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाहतूक शिस्तीसाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, तसेच पोलिसांनीही सर्व प्रकारच्या वाहनांवर समान पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.