तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांची उसाची बिले २५ जुलैपर्यंत देण्यात येतील. तसेच कामगारांचा पगार दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तुळजाभवानी साखर कारखान्याच्या विरोधातील तुळजापूर तहसील समोर सुरू असलेले शिवसेनेचे नेते अमोल जाधव यांचे उपोषण सोडण्यात आले. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांनी उसाचा रस देऊन हे उपोषण मागे घेण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते ऋषिकेश मगर, काँग्रेस लीगल सेल तालुका अध्यक्ष ढवळे, सचिन अमृतराव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते अमोल जाधव यांनी शेतकऱ्यांनी कारखान्याला घातलेल्या उसाची बिले अद्याप दिलेली नसल्यामुळे शेतकऱ्याची बाजू घेऊन हे उपोषण सुरू केले होते. कारखान्याच्या कामगारांना चार महिन्यापासून पगार नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. ही बाब देखील त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून शासनासमोर मांडली. काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर यांनी कारखाना प्रशासनाबरोबर बोलणी करून २५ जुलैपर्यंत उसाचे बिल देण्याच्या अनुषंगाने यशस्वी चर्चा केली. त्यानुसार मिळालेल्या आश्वासनानंतर सकाळपासून सुरू असलेले अमोल जाधव यांचे उपोषण सायंकाळी साडेपाच वाजता सोडण्यात आले.
कारखाना प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल कामगार व शेतकरी हित लक्षात घेऊन उपोषण मागे घेत आहोत. दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न झाल्यास तातडीने दुसऱ्या आंदोलनाला सुरुवात केली जाईल.- शिवसेना नेते अमोल जाधव