धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तीन जागा मागितल्या असून त्यातील २ जागा नक्की पक्षाला सुटतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर उपस्थित होते.
आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की जिल्ह्यातील परंडा, तुळजापूर आणि धाराशिव या तीन जागा आम्ही मागितल्या आहेत. या तिन्ही विधानसभा मतदारसंघांसाठी १७ जणांनी मुलाखती दिल्या आहेत.
यातील दोन मतदारसंघा पक्षाला नक्की सुटतील, अशी आम्हाला खात्री आहे. त्यात परंडा आणि तुळजापूर हे दोन मतदारसंघ आम्हाला सुटतील व पक्षाचा विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुळजापूर विधानसभा श्री. निंबाळकर यांनी २०१४ मध्ये लढविली होती. यावेळी आपण यासाठी इच्छुक असून सर्व १९२ गावांत दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी आघाडी धर्म महत्वाचा असून पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्यानुसार काम करू, असेही त्यांनी सांगितले.