Wild boars wreak havoc at Talni; soybean crops destroyed, farmers in distress
तळणी, पुढारी वृत्तसेवाः मंठा तालुक्यातील तळणी परिसरात रानडुकरांच्या कळपाने धुमाकूळ घालून काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, वर्षभराची मेहनत मातीमोल झाली आहे. वन विभाग आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
तळणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचा वावर प्रचंड वाढला आहे. रात्रीच्या वेळी हे कळप शेतात घुसून उभ्या पिकाची नासाडी करत आहेत. सध्या सोयाबीनचे पीक पूर्णपणे तयार झाले असून काढणीचे दिवस सुरू आहेत.
ऐनवेळी डुकरांमुळे पिकाचे नुकसान होत असल्यामुळे लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जबाजारी होऊन आणि रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांनी हे पीक जोपासले होते, मात्र वन्यप्राण्यांच्या या उपद्रवामुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. बँकचे कर्ज व दिवस-रात्र एक करून सोयाबीनचे पीक उभे केले होते. पीक चांगले आल्याने चार पैसे हातात येतील अशी आशा होती.
यावर्षी अत्यल्प पाऊस पडलेला असतानासुद्धा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पाणी देऊन ती जगवली आहे. अशातच या वन्यप्राण्यांचा त्रास होत असल्याने वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे-- सचिन सरकटे, पीडित शेतकरी, तळणी.