परसोडा : वैजापूर तालुक्यातील परसोडासह अनेक गावात मागील दोन वर्षांपासून वन्यप्राणी शेतीमालाची नासाडी करत आहे. यामुळे शेतीव्यवासाय आर्थिक कोंडीत सापडला आहे. दिवाळीनंतर अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका, कांदा, ज्वारी या पिकांची पेरणी झाली, परंतु हरणाचे कळपासह रानडुक्कर हे पिके फस्त करीत आहेत. ही समस्या दरवर्षी येत असुन याकडे लोकप्रतिनीधीसह वनविभागाचे दूर्लक्ष असल्याचा अरोप परीसरातील शेतकरी करीत आहेत.
परसोडा, मिरकनगर, भिवगांव, औरंगपूर, संजरपुरवाडी, बेंदवाडी, शिवराई येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा महसूल विभाग व वनपरिक्षेत्र विभागात लेखी तक्रार करूही संबधित अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. सध्या परीसरात २० ते २५ रानडुक्करांच्या कळपाने उच्छाद मांडला आहे. यासोबत पिकांची हरीणाकडुन नासाडी होत आहे. या परीसरात १५० ते २००च्या आसपास हरीण आहेत. या कळपाने धुडगुस घातला असुन पिकांची नासधूस करीत असल्याने शेतकरी अर्थिक अडचणीत सापडले आहेत. दिवसभर हरीणाचा त्रास तर रात्रभर जागुन डुक्कर पिके खात असल्याने शेतकरीे मोठ्या संकटात सापडला आहे. याप्रश्नी शासनाने लक्ष घालुन न्याय द्यावा अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
वन विभागाचे दूर्लक्ष रान डुक्कर यांच्या सतत होणाऱ्या पिंकाच्या नुसकानी विषयी वन विभागला कुठलेही देणे-घेणे नाही तर लोकप्रतिनीधीचा अधिकाऱ्यावर वचक नसल्याने या समस्येवर तोडगा निघणार कसा व शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची?- सोमनाथ गायके (शेतकरी भीवगांव)
डुकरांचा बंदोबस्त करावा सध्या रानडुक्कर यांच्या कळपांनी शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. पिकांचे मोठे नुसकान होत आहे. वनविभागाने वन्य प्राणी पकडुन जेथे प्रकल्प आहे तेथे नेऊन सोडावे जेणे करून पिकांची नासाडी थांबेल व शेतकऱ्यांचे नुसकान टळेल.- राजुभाऊ छानवाल (उपसरपंच परसोडा)
नुकसान ग्रस्त शेतकर्यांची पाहणी करू ज्या शेतकर्यांचे शेतमालाचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे त्यांनी वनविभागाकडे झालेल्या नुकसानीचा फोटो काढून तक्रार करावी आमचे कर्मचारी पाहणी करतील.- पुजा बहिसे (वनपरिक्षेत्र, अधिकारी वैजापूर)