Vijaya Rahatkar : Zero tolerance on crime, sensitivity towards victim
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महिला सुरक्षा हा सुशासनाचा मुख्य मापदंड असून जेंडर सेन्सेटिव्ह पोलिसिंग हा राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता आणि पीडितांबाबत कमाल संवेदनशीलता ठेवून सुरक्षित समाज घडवण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र राज्याचा महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग आणि छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २२) एमआयटी मंथन हॉल, सातारा परिसर येथे पोलिस अधिकाऱ्यांसाठी एका विशेष क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रहाटकर बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, महानिरीक्षक शारदा राऊत, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, उपसंचालक रामावतार सिंह, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजया रहाटकर पुढे म्हणाल्या, सायबर सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा' आहे. डीपफेक, मॉर्निंग आणि एआय आधारित फसवणूक हे थेट महिलेच्या सन्मानावर होणारे हल्ले आहेत. गुन्हेगारांवर मात करण्यासाठी भविष्यातील पोलिसिंग हे माईंड पॉवर, मशीन पॉवर आणि डेटा पॉवरवर आधारित असायला हवे. कार्यशाळेची प्रस्तावना पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत यांनी केली. तर, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या कार्यशाळेची उद्दिष्टे व रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.
या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, रेल्वे, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पोलिस घटकांतील तब्बल ४०० महिला व पुरुष तपास अधिकारी उपस्थित होते. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अंमलदार यांचा सहभाग होता. पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दिग्गजांचे सखोल मार्गदर्शन
माजी न्यायमूर्ती साधना जाधव यांनी पोलिस तपासातील लिंग संवेदनशीलता' या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या कायदे तज्ज्ञ दीपाली श्रीवास्तव यांनी पॉश कायद्याचे व कायदेशीर तरतुदींचे सविस्तर विश्लेषण केले. सायबर तज्ज्ञ आणि आयपीएस अधिकारी डॉ. बालसिंग राजपूत यांनी महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांचे वाढते स्वरूप आणि जोखीम यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. सायबर तज्ज्ञ व निवृत्त अपर पोलिस अधीक्षक डॉ. संजय डी. तुंगार यांनी डिजिटल पुरावे गोळा करणे, सोशल मीडिया इंटेलिजन्स आणि सायबर फॉरेन्सिक्सची आधुनिक व उपयुक्त तंत्रे समजावून सांगितली. राती फाउंडेशनचे सलमान मुजावर यांनी व्हिक्टिम-सेंट्रिक रिस्पॉन्स आणि आंतर-संस्थात्मक समन्वय यावर सखोल मार्गदर्शन केले.