छत्रपती संभाजीनगर : शहरातील तापमानाने काही अंशी उसळी घेतली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्यावरही दिसून येत असून, भाजीबाजारात दररोज भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे दिसून येत आहे. यात काही भाज्या महागल्या तर काहींच्या दरात घसरण झाली आहे.
लिंबू, मिरची आणि लसणच्या दराने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावल्याचे चित्र आहे. मात्र टोमॅटो, बटाटे आणि कोबीच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तापमानाचा चटका वाढताच काही भाजीपाल्यांच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात लिंबाचे दर २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. सध्या हेच दर २१० ते २३० रुपये असल्याने लिंबू अजूनही महागच आहे.
त्याचबरोबर हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होऊन ती १०० ते १२० रुपये किलोवर पोहोचली आहे. वांग्यांचे दरही वधारले असून, ७० रुपये किलोवर पोहोचले आहेत. भेंडीचे दर वाढून ८० रुपये किलोवर गेले आहेत. दुसरीकडे काही भाज्यांच्या दरात घट झाली आहे.
टोमॅटो आणि बटाट्याचे दर दहा रुपयांनी कमी होऊन सध्या प्रत्येकी २० रुपये किलोवर आले आहेत. मागील आठवड्यात ४० रुपये किलो असलेली कोबी सध्या ३० रुपये किलो दराने विकली जात आहे. तसेच काकडी, भोपळा आणि गाजर यांच्या दरातही घट होऊन ते ५० रुपयांवरून ४० रुपये किलोवर आले आहेत.
पालेभाज्यांच्या दरात मात्र स्थिरता असून मेथी, पालक, चुका आणि करडीची जुडी ८ ते १० रुपयांना मिळत आहे. शिमला मिरची आणि कारल्याचे दर वाढून ८० रुपये किलोवर गेले आहेत, तर गिलके आणि दोडके यांचे दर सध्या ८० रुपये किलोवर स्थिर आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी २५० ते ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचलेले लसणाचे दर सध्या कमी झाले असले तरी अजूनही लसूण मालाच्या गुणवत्तेनुसार १०० ते १५० रुपये किलो दराने विकला जात आहे. जाधववाडी मंडईत लसणाची आवक वाढल्याने दरात काही प्रमाणात घट झाल्याची माहिती भाजीपाला विक्रेते किरण मगरे यांनी दिली.