वैजापूर : शहरात मजूर तरुणाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबाकडून 15 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघा आरोपींना वैजापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शोधून काढत दोन जणांना अटक केली आहे.
अवघ्या 24 तासांत शिवम् सुभाष सुरडकर (रा. बर्डी मस्जिद, वैजापूर) व सचिन बाळू गोरे (रा. मसनखाई, वैजापूर) या दोन संशयित आरोपींना जेरबंद केले. सचिन मुरलीधर पवार (रा. खंडोबानगर, वैजापूर) हा संशयित आरोपी फरार आहे.
शहरातील 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. अपहरणानंतर तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम व दागिने हिसकावून आरोपींनी पळ काढला होता. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सध्या फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मजूर तरुणाच्या अपहरण प्रकरणामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अपहरण करून कुटुंबाकडून खंडणी मागितल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान - उभे राहिले. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अवघ्या 24 तासांत शिवम् सुभाष सुरडकर व सचिन बाळू गोरे या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि विजय देशमुख, पोउपनि एकनाथ नागरगोजे यांच्यासह पोलिस अंमलदार योगेश झाल्टे, योगेश तरमाळे (सायबर), अमोल कांबळे, अभिजित डहाळे, प्रशांत गिते, सचिन रत्नपारखे, उमेश जमदाडे आदी सहभागी झाले होते.
असा रचला अपहरणचा डाव
बांधकामावर काम करणारा मजूर तरुण इमान अलीम अन्सारी हा मासे घेण्यासाठी झगडा फाटा येथे गेला होता. परत येत असताना बोथरा पेट्रोलपंपाजवळ दुचाकीवर आलेल्या तीन आरोपींनी त्याला जबरदस्ती गाडीत बसवून अपहरण केले. त्यानंतर त्याच्या मोबाईलवरून कुटुंबीयांना फोन करून 15 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली.