छत्रपती संभाजीनगर : राज्यातील एकमेव शासकीय सैनिकी सेवापूर्व संस्थेने (एसपीआय) यंदाही आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेचे तब्बल ६० छात्र आणि ६ छात्रा संघ यूपीएस्सीच्या एनडीए लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आता देशातील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून या विद्यार्थ्यांची मुलाखतीची तयारी करून घेतली जाणार आहे. आतापर्यंतच्या ४८ मुलाखतीची तयारी करून घतला जाणार आहे. आतापर्यंतच्या ४८ वर्षांच्या वाटचालीत या संस्थेने देशाच्या तिन्ही सैन्य दलांना सुमारे साडेसहाशे अधिकारी दिले आहेत.
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे कर्नल मकरंद देशमुख (निवृत्त) यांनी मंगळवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत याविषयीची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालीन विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी घडवण्यासाठी केंद्र सरकारने पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था स्थापन केलेली आहे. भूदल, वायुदल व नौदल या तिन्ही दलांसाठी राष्ट्रीय प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी यूपीएस्सीकडून परीक्षा घेण्यात येते. या यूपीएस्सी एनडीए लेखी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील राज्य सरकारच्या एसपीआय संस्थेतील ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यासोबतच एसपीआयच्या अंतर्गत नाशिक येथे नव्याने सुरू झालेल्या मुलींच्या संस्थेतील ६ विद्यार्थिनीही उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण सर्व विद्यार्थी आता डिसेंबर - जानेवारी महिन्यात होणाऱ्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. वैद्यकीय चाचणी पार पाडल्यावर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एनडीएच्या १५६ व्या तुकडीत आणि नेव्हल अकॅडमीच्या ११८ व्या तुकडीत प्रवेश मिळणार आहे. मुलाखतींत यशस्वी होण्यासाठी या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगरातील एसपीआयमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी देशभरातील तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती मकरंद देशमुख यांनी दिली.
लेखी परीक्षेत ४८ तुकडीतील २८ विद्यार्थी आणि ४७ तुकडीतील २५ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यात बीडचे २, छत्रपती संभाजीनगरचे ४, कोल्हापूरचे ५, नागपूरचे २, साताऱ्याचे ३, पुण्याचे ५, अहिल्यानगरचे २, नाशिकचे ४ आणि अकोला, भंडारा, धुळे, सोलापूर, ठाणे, मुंबई, सांगली व रायगड येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक येथील तिसऱ्या तुकडीतील ४ मुली आणि मागील तुकडीतील २ मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या यशामुळे महाराष्ट्रातील महिला विद्यार्थिनींनाही संरक्षण सेवांमध्ये प्रवेशाचा मार्ग अधिक बळकट झाला आहे.
संचालकपदी कर्नल मकरंद देशमुख रुजू
छत्रपती संभाजीनगरातील एसपीआयचे संचालक पद डिसेंबर २०२२ पासून रिक्त होते. आता या पदावर शासनाने कर्नल मकरंद देशमुख यांची नियुक्ती केली आहे. देशमुख हे ९ ऑक्टोबर २०२५ रोजी संचालक म्हणून रुजू झाले आहेत. २०२६ मध्ये एसपीआयला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने यानिमित्त संस्थेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाच्या मदतीने पुढील दोन वर्षांत विविध स्तरांवर उपक्रम राबविण्याचे त्यांनी संकेत दिले.