छत्रपती संभाजीनगर- विद्यापीठाने विनाअनुदानित तत्वावर सुरू केलेल्या अनेक डिप्लोमा अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. तब्बल ९ असे अभ्यासक्रम आहेत, त्यात प्रवेश घेण्यासाठी एकाही विद्यार्थ्याने अर्ज केला नाही तर सुमारे १३ अभ्यासक्रम आहेत, त्यासाठी केवळ एक एक विद्यार्थ्यानेच अर्ज केला आहे. अर्ज केलेले विद्यार्थी प्रवेश घेणार किंवा नाही हा येणारा काळच ठरवणार आहे. प्रवेश अर्जाच्या आलेल्या या संख्येवरून अनेकांनी विद्यापीठाच्या नियोजनांवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आतापर्यंत २ हजार ९१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मानव्यविद्या शाखेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, त्यापाठोपाठ विज्ञान व तंत्रज्ञान शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. दरम्यान, नियमित अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी नवीन पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी नापसंती व्यक्त केल्याने आता या अभ्यासक्रमाचे पुढील भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही अभ्यासक्रमांना शून्य नोंदणी
अनेक पारंपरिक आणि विशेष अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी एकाही विद्यार्थ्याने अर्ज सादर केला नाही. यात विज्ञान शाखेतील एमएससी कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, एमएससी गणित (नॉन ग्रँट), डिप्लोमा इन अॅप्लाईड ऑप्टिकलवेअर, अॅक्वाकल्चर, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, लईव्हस्टॉक प्रॉडक्शन, चायनीज भाषा, एमएएन टायपोग्राफी तसेच दलित थिअटर स्टडीज अँड आंबेडकरी जलसा या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी एकही अर्ज आलेला नाही.
केवळ एक ते तीन अर्ज
एमएससी इलेक्ट्रॉनिक्स, एमएससी हर्बल टेक्नॉलॉजी, अॅडव्हान्स डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर, प्लॅट टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी, अॅडव्हेंचर टुरिझम, बौद्धिस्ट टुरिझम, मेडिकल टुरिझम, मास्टर ऑफ आर्ट्स महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग स्टडीज या अभ्यासक्रमांसाठी केवळ एक ते तीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील किती नोंदीत विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील याची माहिती प्रवेश प्रकिया पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.
काहींना पोसण्यासाठीच अभ्यासक्रम सुरू
अनेक अभ्यासक्रमांना एकही प्रवेश अर्ज नाही. लाखो रुपयांचा खर्च वाया गेला. योग्य नियोजन झाले असते तर ही वेळ आली नसती. हा केवळ विशिष्ट विचार-सरणीच्या लोकांना सांभाळण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. शंकर अंभोरे, माजी व्यवस्थापन सदस्य