Tourists Crowd Ajanta caves
सागर भुजबळ
फर्दापूर : निसर्ग सौंदयनि नटलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत रविवारी (दि. २६) पर्यटकांची तुफान गर्दी उसळली. दिवसभरात ५ हजार शंभर पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिल्याचे दिसून आले. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गुरुवारपासूनच लेणी सफरीवर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. अखेर रविवारी सकाळपासूनच लेणी परिसरात पर्यटकांचा जनसागर - उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले असून मागील चार दिवसात एकूण १८ हजार ३१० पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली आहे.
गुरुवारपासूनच सकाळी अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे फर्दापूर-अजिंठा लेणी टी-पॉईंट येथील दोन्ही वाहनतळ दरर ोज हाऊसफुल्ल होत आहेत. त्यामुळे दुपारच्या सत्रात येणाऱ्या पर्यटकांना आपली वाहने अजिंठा घाटाखालील छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभी करून लेणीची सफर करावी लागत आहे. हे दृश्य मागील चार दिवसांपासून सातत्याने दिसून येत आहे.
सलग चार दिवसांपासून (गुरुवार ते रविवार) अजिंठा लेणीतील पर्यटन व्यवसायाला अक्षरशः मसुगीचेफ दिवस आल्याचे दिसून आले. पर्यटन महामंडळ, एस.टी. व भारतीय पुरा तत्त्व विभाग या तिन्ही यंत्रणांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळाल्याचे समजते. तसेच टी पॉइंटवरील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक विक्रेते यांनाही चांगले उत्पन्न मिळाल्याने परिसर पुन्हा एकदा चैतन्यमय झाला आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ३ हजार ३७६, शुक्रवारी ४ हजार ३०१, शनिवारी ५ हजार ५३३, तर रविवारी ५ हजार शंभर, अशा एकूण १८ हजार ३१० पर्यटकांनी सलग चार दिवसांत अजिंठा लेणीची सफर केल्याचे दिसून आले आहे.
सप्तकुंड धबधब्यावर पर्यटकांचे हाल !
दरम्यान, दिवाळी सुट्ट्यांमुळे अजिंठा लेणी परिसरात गर्दी उसळत असतानाच सप्तकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे. मात्र व्यवस्थापनाच्या अभावामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. धबधब्याजवळील सुरक्षा कठडे जीर्णावस्थेत असून अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. त्यामुळे पर्यटक दरीच्या काठावर धोकादायक पद्धतीने सेल्फी घेताना दिसतात. पूर्वीचे वनउद्यान अनेक वर्षांपासून बंद असून, त्याभोवती काटेरी झुडपे व गवत पसरले आहे. त्यामुळे पर्यटकांना आता खडतर डोंगर चढून धबधब्यापर्यंत पोहोचावे लागत आहे,
रस्त्याची ही लागली वाट
फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा या चार किमीच्या अंतरात रस्त्याचीही वाट लागली आहे. टी पॉइंट बसस्थानक परिसरात मोठमोठ्या खड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून पर्यटकांना दणक्याचा प्रसाद घेतच लेणीच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच याच मार्गावरील वनविभागाच्या जुन्या गेस्ट हाऊस जवळील रस्त्यावर काटेरी झुडपाच्या फांद्या आल्याने बसमधील पर्यटकांना या काट्याकुट्यांचे फटके बसताना दिसत असून पर्यटन महामंडळाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.