Tourist footfall increases in the restricted Gautala Sanctuary
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गौताळा अभयारण्यात दरवर्षी वन्यजीवांचे संरक्षण, प्रजननाचा काळ आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने १ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येते. मात्र यावर्षीही बंदी आदेश लागू असतानाही काही पर्यटक अभयारण्य परिसरात प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. तपासणी नाक्यांवर वाहनांची प्रभावी तपासणी होत नसल्याने पर्यटकांना प्रवेश मिळत असल्याची चर्चा असून, वन कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गौताळा पावसाळ्यात अभयारण्यातील धबधबे, हिरवाई आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होत असतात. मात्र हा काळ वन्यजीवांच्या प्रजनन व अधिवासाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने शासनाने प्रवेशबंदी लागू केली आहे. तरीही काही पर्यटक बंदी आदेशाचे उल्लंघन करून अभयारण्यात प्रवेश करत असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या संदर्भात वनपरीक्षेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांनी सांगितले की, अभयारण्यातून जाणारा रस्ता हा सार्वजनिक जोडमार्ग असल्याने स्थानिक नागरिक व वाहनांची नियमित ये-जा सुरू असते. त्यामुळे सर्व वाहने अडविणे शक्य नसले तरी या मार्गाचा वापर करून कोणीही पर्यटनस्थळांकडे जाणार नाही, यासाठी तपासणी नाक्यांवर वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
बंदी काळात पर्यटकांचा अनधिकृत प्रवेश होत असल्याबाबत निदर्शनास आलेल्या बाबीची वन विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून, तपासणी नाक्यांवरील वाहन तपासणी अधिक कडक करण्याबाबत तसेच संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.
नियमांचे उल्लंघन करून अभयारण्यात प्रवेश करणाऱ्यांवर वन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गव्हाणे यांनी दिला. पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनीही बंदी कालावधीत नियमांची कठोर अंमलबजावणी करून अभयारण्यातील वन्यजीव पर्यावरणाचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.