Tomato Price Crash Sparks Farmer Protest 
छत्रपती संभाजीनगर

Tomato Price Crash Sparks Farmer Protest-टोमॅटोच्या भावात अचानक मोठी घसरण, शेतकरी संतप्त

करमाड येथे महामार्गावर रास्ता रोको; लिलाव बंद पाडला

पुढारी वृत्तसेवा

करमाड : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत बुधवारी (दि. २६) टोमॅटोच्या दरात अचानक मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. व्यापाऱ्यांनी टोमॅटोचे भाव अचानक १८ रुपयांवरून थेट ८ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आणल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

पोलिसांची मध्यस्थी, महामार्ग मोकळा

शेतकऱ्यांच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी बाजार समितीचे सभापती श्रीराम शेळके आणि संचालक दत्ता उकर्डे यांनी आंदोलनस्थळी पोहोचून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतमालाला योग्य न्याय देण्याचे आणि व्यापाऱ्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी

आंदोलन मागे घेतले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. चर्चेनंतर खरेदी पूर्ववत आंदोलन मागे घेतल्यानंतर कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात सभापती, संचालक, व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधींची तातडीची बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर टोमॅटोची खरेदी पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली.

बुधवारी बाजारात टोमॅटोची आवक अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रमाणात झाली. आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी आज टोमॅटोचे खरेदी दर कमी केले होते. यापूर्वी याच बाजार समितीत १८ रुपये प्रति किलो दराने टोमॅटो खरेदी केला गेला होता. मात्र, दर अचानक कमी झाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलन केले. आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली.

- श्रीराम शेळके सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

नेमका प्रकार काय घडला?

करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजप्रमाणे बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास टोमॅटो खरेदी आणि लिलावाला सुरुवात झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. मात्र, बाजारात टोमॅटोची आवक अचानक वाढल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी खरेदी दर १८ रुपये प्रति किलोवरून थेट ८ रुपये प्रति किलोवर आणले. ऐन हंगामात आणि कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला अचानक निम्म्याहून कमी दर मिळाल्याचे पाहून शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. व्यापाऱ्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी खरेदी तत्काळ बंद पाडली आणि महामार्गावर डाव घेत ठिय्या मांडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT