Tiranga March in the city in protest against the lathi-charge on students
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच देशभरातील पेपरफुटीच्या घटनांविरोधात रविवारी (दि.२६) सकाळी शहरात तिरंगा मार्च काढण्यात आला. क्रांती चौक ते पैठणगेटदरम्यान निघालेल्या या मार्चमध्ये विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व देशभरातील पेपरफुटीच्या घटनांविरोधात रविवारी सकाळी क्रांती चौक येथून तिरंगा मार्च काढण्यात आला. यावेळी हातात राष्ट्रध्वज, महापुरुषांचे फलक आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधातील घोषणाबाजी करत हजारो नागरिक या मार्चमध्ये सहभागी झाले.
विद्यार्थ्यांना न्याय द्या, पेपरफुटी थांबवा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला. यावेळी देशातील स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
कथित विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचाही निषेध करत अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. आमदार अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्ता केली. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या तिरंगा मार्चमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, सीपीआयचे नेते कॉम्रेड अभया टाकसाळ यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काळ्या पोशाखातून नोंदविला निषेध
विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ला आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ मार्चमध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी काळे कपडे परिधान केले होते. हातात तिरंगा आणि निषेधाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.