The Sukhna river basin took a breath of fresh air
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खाम नदीप्रमाणेच आता महापालिकेने सुखना नदीचे पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत सुखना नदीत येणारे दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्यासोबतच नदीपात्रात खोलीकरण आणि अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहे.
या मोहिमेत बुधवारी (दि.२०) महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने चिकलठाण्यातील मोतीवाला कॉलनीलगत सुखना नदीपात्रात असलेले २५ अतिक्रमण जमीनदोस्त केल्याने नदीपात्राने मोकळा श्वास घेतला आहे. याअगोदर दोन आठवड्यांपूर्वीच पथकाने येथील ३० हून अधिक अतिक्रमण भुईसपाट केली होती.
शहरातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली सुखना नदी पुनरुज्जीवनाचा उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. चिकलठाण्यातील विविध वसाहतींतील नागरिकांनी थेट नदीपात्र गिळंकृत करीत त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे आणि उपआयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी मोतीवाला कॉलनीतील सुखना नदीच्या काठावर असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात आली.
मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन महापालिकेचे पथक या वसाहतीमध्ये दाखल झाले. ३२ पैकी ७ जणांनी स्वतःहून अतिक्रमण हटविले, तर उर्वरित २५ अतिक्रमण मुदतीनंतरही जैथे थेच राहिले. अखेर महापालिकेच्या पथकाने या अतिक्रमणावर जेसीबी फिरवत ते जमीनदोस्त केले. या मोहिमेत झोन क्रमांक ६ चे पदनिर्देशित अधिकारी नीलेश पाटणी, इमारत निरीक्षक गणेश वीर, सागर देसाई आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी होते.