The state government on Thursday approved a fund of Rs 1,346 crore to help farmers.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पावसामुळे मराठवाड्यातील शेती पिकांचे जे नुकसान झाले, त्याबद्दल शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने गुरुवारी १३४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याआधी जून ते ऑगस्ट महिन्यातील नुकसानीबद्दल राज्य सरकारने मराठवाड्याला १४८३ कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा सातत्याने अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आधी जून महिन्यात, नंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात शेकडो महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्याचे पंचनामे होऊन शासनस्तरावर मदतीचा प्रस्ताव सादर झाला. त्यानंतर लगेचच सप्टेंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टी झाली आणि जी पिके उरली होती व हाताशी आली होती तीही वाया गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जून ते ऑगस्टदरम्यानच्या नुकसानीबद्दल मराठवाड्यासाठी १४८३ कोटी रुपयांचा निधी दिला. तो निधी सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने गुरुवारी सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटीही आर्थिक मदत मंजूर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यातील शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने आतापर्यंत एकूण २८२९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सुरुवातीला चौदा वेगवेगळ्या अध्यादेशांद्वारे १४१८ कोटी रुपये देण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आणखी ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. गुरुवारी आणखी १३४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
राज्य सरकारने मंजूर केलेली ही मदत दोन हेक्टरच्या मयदित देण्यात येणार आहे. हा निधी डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे. ही रक्कम बँकांनी कर्जखात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे आदेशही महसूल खात्याने दिले आहेत.
राज्य सरकारने गुरुवारी मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांसाठी नव्याने १३४६ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यातून २१ लाख बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ५७७ कोटी रुपयांची मदत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ धाराशिव जिल्ह्यासाठी २९२ कोटी, लातूर जिल्ह्यासाठी २०२ कोटी, परभणी जिल्ह्यासाठी २४५ कोटी आणि नांदेडसाठी २८ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
मराठवाड्यासोबतच राज्य सरकारने गुरुवारी पुणे विभागातील सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांसाठीही एकूण ९ कोटी ४७ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरसाठी ३ कोटी १८ लाख आणि सातारा जिल्ह्यांसाठी ६ कोटी २९ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.