The Rural Police have taken aggressive measures to curb cattle smuggling and illegal slaughter in the district.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि बेकायदेशीर कत्तलीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी आक्रमक पावले उचलली आहेत. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार गुन्हेगारांवर कायमस्वरूपी वचक निर्माण करण्यासाठी पहिल्यांदाच थेट प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) गोवंश तस्करी करणाऱ्या ५ वाहनांचे ३० दिवसांसाठी आणि ६ चालकांचे ९० दिवसांसाठी परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच परराज्यातील वाहनांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्तावही पाठवण्यात आले आहेत.
गेल्या दहा दिवसांत (१६ ते २६ मे) ग्रामीण पोलिसांनी वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोडसह संपूर्ण जिल्ह्यात कडक नाकाबंदी आणि छापे मारून गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक मोहिमेत २४ गंभीर गुन्हे दाखल करत तब्बल ४४ आर ोपींना निष्पन्न करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १ हजार ९४५ किलो गोमांस आणि १११ जिवंत गोवंश असा एकूण ५५ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दहा दिवसांत १११ गोवंशाची सुटका
अत्यंत क्रूरतेने आणि कोंबून वाहून नेल्या जाणाऱ्या ६९ जनावरांची आणि कत्तलीसाठी निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या ४२ अशा एकूण १११ जनावरांची पोलिसांनी दहा दिवसांत सुटका केली. या सर्व जनावरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोवंश तस्करांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अत्यंत आक्रमकपणे सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.