The Maratha Kranti Morcha is aggressive against Minister Vikhe for not coming to the hunger strike site
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः मराठा समाजाच्या शाश्वत आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते-पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा गुरुवारी (दि. २०) बारावा दिवस होता. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील शहरात येऊनही आंदोलनस्थळी न आल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या संतापाचा उद्रेक झाला. विखे-पाटील आंदोलनस्थळी येणार असल्याचे आंदोलकांना कळविण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते न आल्याने आंदोलकांनी सरकारसह विखे-पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
सलग १२ दिवसांच्या उपोषणामुळे दाते-पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांची रक्तातील साखर ४७ पर्यंत घसरली असून, रक्तदाबातही चढ-उतार होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला असतानाही मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका दाते-पाटील यांनी कायम ठेवली आहे.
दरम्यान, विखे-पाटील यांनी तातडीने आंदोलनस्थळी येऊन सात मागण्यांवर भूमिका स्पष्ट न केल्यास शुक्रवारी सकाळी उपोषणकर्ते रक्तदान करून ते रक्त विखे-पाटील यांना पोस्टाने पाठवतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन तीव्र करून विखे-पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी जाऊन जाब विचारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच दाते-पाटील यांच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, अॅड. योगेश केदार यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दाते-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी प्रा. माणिकराव शिंदे, बापूसाहेब शिरसाठ, डॉ. शिवानंद भानुसे, योगेश शेळके, सुनील कोटकर, विजय काकडे, निखील काकडे, संदिप पाटील, अमित जाधव, रवींद्र बनसोड किशोर चव्हाण आदींची उपस्थिती होती.
सरकारला जागे करण्यासाठी आज जागरण गोंधळ आंदोलन दरम्यान, गेल्या बारा दिवसांपासून दाते-पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या सकाळी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी' जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, त्यानंतर मोर्चाचे पदाधिकारी माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
विखे तुम्ही मराठा समाजाला फसवलेचा सवाल ?
विखे-पाटील यांच्या विरोधात आंदोलकांनी आक्रमक घोषणाबाजी केली. 'विखे, तुम्ही मराठा समाजाला धोका दिला आहे. याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल', 'तुम्ही मराठा समाजाला फसवले आहे', अशा घोषणा देण्यात आल्या. दाते-पाटील अभ्यासपूर्वक मांडणी करणार असून त्यातून सरकारचे आणि विखे-पाटील यांचे 'पितळ उघडे पडणार' असल्यानेच ते आंदोलनस्थळी आले नाहीत, असा आरोपही संतप्त आंदोलकांनी केला.
बावनकुळेंचा व्हिडिओ कॉल; लेखी हमीची मागणी
दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉलद्वारे दाते-पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा समाजाला राजकीय आरक्षण वगळता ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलती द्याव्यात, यासह आदी मागणी दाते-पाटील यांनी मांडल्या. यावर मंत्री बावनकुळे यांनी माझ्या विभागाशी संबंधित विषयाबाबत मीटिंग लावतो आणि त्यावर निर्णय घेतो असे सांगितले.