The Kharat matter has spiraled out of control; everything will come to light during the inquiry
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भोंदू अशोक खरातचे प्रकरण अत्यंत मोठे आहे. हे प्रकरण अगदी हाताबाहेर असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा याची सखोल चौकशी करीत आहेत. चौकशीत जे काही निष्पन्न होईल. खरातला त्या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागेल, असे रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी (दि.६) सांगितले.
गोगावले यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना व भूसंपादन प्रकरणांबाबत आढावा बैठक घेतली. बारामती पोटनिवडणुकीविषयी गोगावले म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे.
भाजप असेल किंवा शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष असेल सर्वांनी पवार यांचाच अर्ज भरण्याचा ठरविले होते. आता विरोधक जे काही अर्ज भरत आहेत त्याबद्दल आम्ही काय बोलणार. कुणी उभे राहिले तरी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी महायुती काम करेल, असे गोगावले म्हणाले. आढावा बैठकीला आ. रमेश बोरणारे, विलास भुमरे, रोजगार हमी विभागाचे प्रभारी आयुक्त तथा लातूरचे जिल्हाधिकारी 'भरत बास्टेवाड, उपसचिव अरविंद पगार, सहसचिव अतुल कोरे, नांदेड जि.प. सीईओ मेघना कावली, छत्रपती संभाजीनगर जि.प.सीईओ मीन्नू, पी. एम, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
आजवर १४०० कोटींचा निधी दिला
केंद्र शासनाने नवीन योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेचा लाभकुणाला मिळतो, याची माहिती घेतली. योजनांसाठी निधी येताच तो वितरित केला जात आहे.. केंद्र व राज्यशासनाचे मिळून १४०० कोटी रुपये आजवर दिले आहेत. काही थकबाकी असून, तीही लवकर देण्यात येईल. तीन महिन्यांच्या आत मनरेगाची कामे पूर्ण करावीत.
केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील मनरेगाची कुशल आणि अकुशलची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. घरकुल, पाणंद रस्ते, युक्तधारा प्रणाली, फेस ऑथेंटिकेशन, मजुरांचे मस्टर, शेततळे, कुशल आणि कुशल कामाबाबतीत प्रलंबित कामांचा आढावा घेतला. ई-केवायसीचे प्रमाण कमी आहे, असे भरत गोगावले म्हणाले.