छत्रपती संभाजीनगर : एसटीतून विविध वर्गातील प्रवाशांना पूर्ण मोफत तसेच ५० टक्क्यांची सवलत देण्यात येते. एसटी महामंडळाने (एनएमसी) कार्ड अनिवार्य केले आहे. या कार्डसाठी जिल्हाभर एजन्सी व उप एजन्सी काम करत आहेत. या कार्डसाठी एसटीने १९९ रुपये आकारण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश धाब्यावर बसवत अनेक एजन्सीधारक या स्मार्ट कार्डसाठी ३०० ते ३५० रुपये आकारत आहेत. हे कार्ड एन्सीधारकांसाठी लुबाडणुकीचे कुरण बनले आहे.
एसटीच्या वतीने विविध वर्गवारीतील प्रवाशांना प्रवासात विशेष सूट देण्यात आली आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, माजी सैनिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच व्याधिग्रस्त व इतर सवलतधारक प्रवाशांना हे स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड काढण्यासाठी १९९ रुपये आकारण्यात येत आहेत. दरम्यान, या कार्डची एजन्सी शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर देण्यात आली आहे. हे एजन्सीधारक अमृत ज्येष्ठ, महिलांकडून एका कार्डसाठी ३०० ते ३५० रुपये आकारत आहेत. जास्त पैसे नाही दिले तर कार्ड देण्यास नकार देत आहेत.
एजन्सीधारकांना प्रत्येक कार्डसाठी १० रुपये व कार्डवर रिचार्ज करण्यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी ३ रुपये कमिशन देण्यात येते. असे असले तरी एजन्सी धारक हे कार्ड काढण्यासाठी चक्क जास्तीचे १०० ते १५० रुपये कार्डधारकांकडून उकळत आहेत.
हा महिना शेवटचा आहे कार्ड काढले नाही तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही, अशी भीती अनेक एजन्सीधारक दाखवत आहेत. त्यामुळे सवलतधारक या भीतीपोटी लवकरात लवकर नोंदणी करण्यासाठी घाई करत आहेत. दरम्यान, हे कार्ड कधीपासून अनिवार्य करणार आहे, याची माहिती एसटीकडून अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली नसली तरी एजन्सीधारक मात्र ही भीती सवलतधारकांमध्ये पसरवत आहेत.
तक्रार आल्यानंतर कारवाई "एजन्सीधारक ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आकारत असतील तर कार्डधारकांनी तशी तक्रार करावी. तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे."- संतोष घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी