sambhajinagar strike by land records employees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे, सुधारित आकृतिबंध यांसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवार (दि.२३) पासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले.
जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदत देत सर्व कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. दरम्यान, कामबंद आंदोलनामुळे जमीन मोजणीची कामे ठप्प होऊन नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्यचे अंतर्गत आंदोलन छेडण्यात आले आहे.
सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून असहकार आंदोलन केले, मात्र त्यानंतरही विभाग व शासनस्तरावरून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी व्यथित होऊन सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले.
येथील जिल्हा भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनीही आंदोलनात सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात तांत्रिक कृती समितीचे अनिल देवकर, विवेक कोठाळे, आयुब पटेल, सुरत सूर्यवंशी, कृपाल राजपूत, ज्योती अधाने, सारिका गव्हाणे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते.